सांगली – राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. सांगली जिल्ह्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून प्रतीक पाटील बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनीही 1984 साली आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेऊन केली होती. राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे यानिमित्ताने राजकारणात प्रवेश केला आहे.
जयंत पाटील यांनी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पिढीकडे सत्तेची सूत्रे सोपवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखाना स्थापनेच्या वेळी संचालक होते. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना झाले. जयंत पाटील 10 वर्षे अध्यक्ष राहीले. तसेच आजपर्यंत संचालक होते. मात्र, यंदा प्रतीक पाटील संधी देण्यात आली आहे.