नवी दिल्ली – अदानी प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने चालूच ठेवले आहेत. संबंधित प्रकरणी मोदींनी बाळगलेले मौन केवळ रहस्यमय नसून बोचणारेही आहे. आता त्यांनी मौन सोडावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
अदानी प्रकरणावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य करण्याचे सत्र आरंभले आहे. त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेसने रविवारपासून हम अदानी के हैं कौन या नावाने एक मालिका सुरू केली आहे. त्याअंतर्गत मोदींना दररोज तीन प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानुसार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी तीन प्रश्नांचा समावेश असणारे निवेदन जारी केले.
पहिला प्रश्न अदानी समुहात एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था गुंतवणूक करताना अधिक सजग राहतील याची निश्चिती करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, भांडवलदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी मन की बॅंकिंगचे आणखी एक उदाहरण म्हणून त्या घडामोडीकडे पहायचे का, असा सवाल करण्यात आला आहे.
अदानी समुहावरील फसवणूक आणि मनी लॉण्डरिंगशी संबंधित आरोपांशी निगडीत चार प्रकरणांची चौकशी झाली. त्या माहितीच्या आधारे पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय किंवा एलआयसीमधील कुणी संदिग्ध गुंतवणुकींबद्दल चिंता व्यक्त केली होती का, असा दुसरा प्रश्न विचारण्यात आला आहे. अदानी समुहातील गुंतवणुकीमुळे एलआयसीला झालेल्या नुकसानीची खरी माहिती जाहीर करणार का, असा तिसरा प्रश्न कॉंग्रेसने विचारला आहे.