मुंबई – आगामी मुंबई मनपा निवडणुकीनिमीत्ताने उडणाऱ्या राजकीय धुराळ्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता असून केंद्रीय गृहखात्याकडून सीआरपीएफ व धडक कृती दलाच्या तुकड्या मागविण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न समाजविघातक शक्ती करू शकतील अशी भीती व्यक्त झाल्याने हा निर्णय घेतला गेला.
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप सरकारला तुर्तास धोका नसल्याचे सांगितले जात असले तरीही सरकार अस्थिर असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे समाजविघातक प्रवृत्तींचे फोफावले आहे. त्यात राजकीय व्यासपीठांवरून वाचाळवीर मुक्ताफळे उधळत असल्याने शहरातील संवेदनशील भागात तणावाची भर पडत आहे. विशीष्ट समाजात त्याबद्दल रोष दिसत असल्याचे गुप्तचरांनी नमूद केले आहे.
गेले तीनचार महिने राज्यात काही ठिकाणी स्फोटके शस्त्रसाठ्यांबरोबर, अंमली पदार्थ तस्करी व सोन्याच्या तस्करीचे प्रकारही उजेडात येत आहे. पोलिस, कस्टम, नारकोटिक्स विभाग सातत्याने जागरूक राहून कारवाई करत असतानाही होणारी तस्करी किंवा समुद्रमार्गे येणारे अंमली पदार्थांचे साठे थांबत नाहीत. त्यामुळेही मुंबई शहराच्या जातीय सलोख्याला बाधा पोहचिवण्याचे प्रकार या तस्करीं करणाऱ्यांकडूनही होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती गुप्तचरांना वाटते आहे.
मनपा निवडणुकांच्यावेळी मुंबई शहरात होणारी विवीध पक्षीय कार्यर्त्यांची गर्दी राहणार असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन अपप्रवृत्ती कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोचणारे कृत्य करतील त्यामुळे खबरदारीचे उपाय योजण्याचे संकेत गुप्तचरांनी अहवालांत दिले असून केंद्रीय गुप्तचर खात्याकडे तो सादर केला आहे.
व्हीव्हीआयपींची बडदास्त ठेवावी लागत असल्यामुळे अगोदरच अपुऱ्या असलेल्या मुंबई पोलिस दलावर ताण पडेल असेही मत गुप्तचरांनी व्यक्त केले आहे. सध्याचे पोलिस संख्याबळ बंदोबस्तासाठी अपुरे असून वाढीव बंदोबस्त पुरवावा असे गृहखात्यातील अधिकाऱ्यांना वाटत असल्यामुळे केंद्रींय गृहखाते याबाबत कोणती ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना व उध्दव ठाकरेंची शिवसेना यांच्यातील गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर आत्तापासूनच कारवाईला सुरूवात केली गेल्यास मुंबई, ठाणे, पुणे व नागपूरातील निवडणुका निर्धोक वातावरणांत होण्यास मदत होईल असेही मत गुप्तचरांनी दिल्याचे वृत्त आहे.