बैठक पोटनिवडणुकीची; मोट बांधली नाराजांची
उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर करणार
पुणे – कसबा विधानसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सकाळी बैठक घेतली. “पक्षाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी तीन समित्या नेमल्या आहेत. तसेच इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जातील. त्यानंतर उमेदवाराचे नाव दिल्लीतून घोषित केले जाणार आहे,’ असे सांगत भाजपने कसबा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचा जीव टांगणीला ठेवला आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील यांनी पक्षातील नाराजांनाही सोबत घेत शहरातील संघटना पुन्हा एकदा बळकट करणे, सर्वांना सोबत आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्नही केला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहर सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, कै. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, गणेश बिडकर, हेमंत रासने यावेळी उपस्थित होते.
इच्छुकांचा जीव टांगणीला
कसब्यातून पक्षाचा उमेदवार कोण असेल, यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कसबा विधानसभेसाठी माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, स्वर्गीय मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे इच्छूक आहेत. मात्र, उमेदवारी कोणाला दिली जाणार हे आताच सांगता येणार नाही.
पक्षाकडून राज्याच्या संसदीय समितीकडे सर्व इच्छुकांची नावे कळविली जातील. त्यानंतर त्यातील तीन इच्छुकांची नावे प्रदेश समिती दिल्लीत कळवेल. मग दिल्लीतूनच उमेदवार जाहीर केला जाईल. त्यामुळे उमेदवार कोणीही असला, तरी निवडणूक कमळाच्या चिन्हावर आहे हे लक्षात ठेऊन आतापासूनच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामास लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“राजकीय समिती’ स्थापन
या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहरातील सर्व पदाधिकारी आजी-माजी नेते यांना एकत्र करत भाजपने महापालिकेची तयारी सुरू केली आहे. या बैठकीस पक्षातील सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात काही नाराजांचाही समावेश होता. या सर्वांची मोट बांधत कसबा विधानसभेसाठी भाजपने राजकीय समिती नेमली आहे.
खासदार गिरिश बापट यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार काकडे, मतदारसंघातील सर्व इच्छूक उमेदवारांची “राजकीय समिती’ नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडे कसबा विधानसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधी, प्रतिष्ठित लोक, लोकांशी संपर्क साधायचे, तसेच लोकांची पक्षाबाबत असलेली मते बैठका घेऊन तसेच इतर माध्यमातून जाणून घेण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांना एकत्र काम करावे लागणार आहे.