संगमनेर -राज्यातील राजकारणाने जसा नूर बदलला आहे. तसा संगमनेर तालुक्यातील राजकारणही वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. एकीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुंबाची रणनीती काही भाजपच्या बाजूने झुकती दिसून येत असली तरी चित्र काही अजून स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या काही पुढाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही कॉंग्रेस सोडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे काही पुढारी पक्ष संपुष्टात आणतात की काय असा प्रश्न पक्षातीलच युवकांना पडला आहे.
नुकत्याच झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सासूबाई शशिकला पवार अपक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रचार सुरू असतानाच आम्ही कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्याकडे जाऊन आलो होतो, परंतु त्यांनी आमची दखल घेतली नाही असे सांगितले. याउपरही निवडून आल्यानंतरही आम्ही यशोधन कार्यालयात जाऊन आलो, तेथेही आम्हाला साधे झेंडूचे फुलही दिले नाही की कोणीही आम्हाला विचारले सुद्धा नाही. विशेष म्हणजे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविषयी आम्हांला नितांत आदर व अभिमान आहे असे सांगून पुढाऱ्यांचे कान टोचले आहे.
आमदार बाळासाहेब थोरात हे मंत्री असताना त्यांनी तालुक्याची धुरा सांभाळण्यासाठी भाऊंवर मोठी जबाबदारी दिली. परंतु त्यांच्या काळात तालुक्यातील अनेक गावांत गटागटात झालेली भांडणे, भावकीतील वाद मिटविण्यासाठी त्यांच्यापर्यंत आलेल्या लोकांना न्याय मिळणे दूरच, उलट त्यांच्यातील भांडणे टोकाला जाऊन पोहचली. याबाबत कॉंग्रेसच्याच अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तळेगाव गावातील कॉंग्रेसचा एक गट फुटून मंत्री विखे यांच्या गटात विलीन झाला.
निमज गावातील विद्यानगर येथील एक समाज पहिल्यापासूनच आमदार थोरात यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जाणारा आहे. परंतु त्यांच्या समाजातील काही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आता होत आहे. एकंदरीतच यशोधन येथून तालुक्याचा कारभार पाहणारे स्वतःच्या स्वार्थासाठी जनमाणसांत प्रतिमा असलेल्या आमदार बाळासाहेब थोरातांची प्रतिमा मलिन करत असल्याने तालुक्यातील युवा वर्गही सत्यजीत तांबे यांनी भाजपत प्रवेश केला तरी आम्ही त्यांच्या सोबत राहू अशी भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे खासगीत सांगत आहे.
विखे-थोरात संघर्षातून संगमनेर लक्ष्य
तालुक्यातील प्रत्येक गटात एक पुढारी हा वजनदार मानला जातोय. परंतु त्याच पुढाऱ्यांमुळे तालुक्यातील पक्ष फुटत असल्याचे दिसून येत आहे. तर विखे – थोरात हे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा संगमनेर तालुकाच टार्गेट केल्याचे दिसून येते.