जळोची (बारामती, पुणे) – काय झाडी.. काय डोंगार.. काय हॉटेल… सगळं कसं एकदम ओके मधी, या संवादाने प्रसिद्ध असणारे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या शैलीत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे कौतुक करताना म्हणाले की, …काय ही बारामती..काय हे कृषी प्रदर्शन… काय राजेंद्र दादा पवारांचे नियोजन… आणि सगळं काय बघितलंय… महाराष्ट्रातील शेतकरी एकदम ओके…
मंत्रिमंडळ विस्तारात शहाजी बापू पाटील यांना स्थान मिळणार का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 72 सालच्या मंत्री मंडळापासून झालेले फेरबदल मी बारकाईने बघत आलो आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत सर्वांनी स्वप्न बघायचं असतं. स्वप्न बघायला कोणाचे बंधन नसते त्यासाठी पैसे लागत नाहीत. ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळणार आहे. ज्याच्या नशिबात नाही त्याने आपल्या पक्षात प्रामाणिकपणे राबून काम करायचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
देशभरातील शेती क्षेत्रात बदल होत आहेत. अशा कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून शेती करत आहेत, उत्पादन वाढवत आहेत. या कृषी प्रदर्शनाचा सर्वच शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकरी हितासाठी कृषी प्रदर्शन भरवत असल्याबद्दल पाटील यांनी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांचे कौतुक करून दूध उत्पादन वाढीसाठी, तरकारी व फळबागांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा उपयोग माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचा मानस यावेळी पाटील यांनी बोलून दाखवला.