Devendra Fadanvis on Uddhav Thackeray Aditya Thackeray – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. शहरातील बीकेसी मैदानावर पंतप्रधान मोदी एका सभेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला. ‘राज्यातील जनतेने आमच्या बाजूने कौल दिल्यानंतरही काही लोकांनी गद्दारी केल्याने आमचं सरकार यायला अडीच वर्ष विलंब झाला. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे पाईक असलेल्यांनी सोबत येऊन राज्याच्या जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आणलं.’ असं फडणवीस यांनी म्हंटलं.
दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आजच्या भाषणाचा बहुतांश भाग हा मुंबई केंद्रित होता. यावेळी त्यांनी, मागील काळात महापालिकेत सत्तेत असलेल्यांनी केवळ भ्रष्टाचार केला, कोणतीही विकासकामे केली नाहीत असा आरोप केला. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पुढील अनेक वर्ष रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यास खड्डेच पडणार नसल्याने ज्यांचे खिसे रस्ते सुधारणांच्या कामांतून भरायचे त्यांच्या पोटात दुखू लागल्याचा टोला फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधान मोदींचे वेळोवेळी सहकार्य लागणार | Devendra Fadanvis on Uddhav Thackeray Aditya Thackeray
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी, धारावी विकास प्रकल्पाचा उल्लेख करताना याकामी पंतप्रधान मोदी यांचे वेळोवेळी सहकार्य लागणार असल्याचं म्हंटलं. दरम्यान, ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्याच प्रकल्पांचे लोकार्पण देखील पंतप्रधान मोदींच्याच हस्ते होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. हे विकासाचे नवे मॉडेल असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला.