हैदराबाद – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने केलेल्या अखिलाडू कृतीवर विक्रमादित्य सुनील गावसकर संतापले आहेत. हातात चेंडू नसतानाही इशानने बेल्स उडवून टॉम लॅथमविरुद्ध बादचे अपील केले होते. गंमतीने बेल्स उडवणे ठीक आहे पण बादचे अपील करणे हे क्रिकेट नव्हे, अशा शब्दांत गावसकर यांनी इशानला सुनावले आहे.
कुस्तीपटूंच्या आरोपांबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण द्या; क्रीडा मंत्रालयाचे आदेश
न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव डावातील 16 वे षटक टाकत होता. त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार लॅथम फलंदाजी करत होता. इशान यष्टीच्या जवळ उभा राहून यष्टीरक्षण करत होता. लॅथमने जेव्हा कुलदीपचा पहिला चेंडू खेळला त्यावेळी इशानने बेल्स उडवल्या. त्यावेळी त्याच्या हातात चेंडू नव्हता. तरीही त्याने बादचे अपील केले. अर्थात, लॅथम क्रिजमध्येच होता. पंचांनी रिप्ले घेतला असता ते सिद्धही झाले.
मात्र, गावसकर यांनी इशानच्या या कृतीवर संताप व्यक्त केला. या सामन्यात भारताने 350 धावा केल्या व न्यूझीलंडचा डाव 337 धावांवर संपवताना 12 धावांनी सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. मात्र, भारतीय संघाच्या विजयानंतरही इशानच्या अखिलाडू वृत्तीवर टीकेची झोड उठली आहे. आता या दोन संघातील दुसरा एकदिवसीय सामना येत्या शनिवारी रायपूर येथे होणार आहे.