मुंबई – मुंबईतील काही प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होत आहे. यासाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर त्यांची भव्य सभा पार पडत आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
फडणवीस म्हणाले, 20 वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली. 20 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या केवळ स्वतःची घरे भरली”, मात्रा आता याची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दाखल झाले त्यावेळी विमानतळावर त्यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यानंतर ते बीकेसी मैदानाकडे आले.
यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्याचा विकास ठप्प झाला. मोदींनी मेट्रोचे भूमिपूजन केले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती. पण नियतीसमोर काही चालत नाही.
येत्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला मुंबईचा कायापालट पाहायला मिळेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.