कराड – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात येत्या जून महिन्यापासून केली जाणार आहे. त्यानुसार संपूर्ण देशात तीन वर्षाचा एकच अभ्यासक्रम असणार आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी सांगितले.
येथील कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाइस चेअरमन अनघा पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, “”भगवद्गीता हा केवळ हिंदूचा किंवा एका धर्माचा ग्रंथ नाही. तर तो संपूर्ण जगाला कसे जगावे अन् कसे जगू नये, असे सांगणारे तत्वज्ञान आहे. परंतु, त्याचा आमच्या अभ्यासक्रमात समावेश नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य मोठे आहे. मात्र, अभ्यासक्रमात त्यांचा धडा दोन पानी, तर देशाची घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा धडा एक पानी आहे, अशी खंत चंद्रकातदादा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आताच्या अभ्यासक्रमात फाफटपसाराच जास्त आहे. त्यात इंग्लड, इंडोनेशिया आदी देशांचा भूगोल असून त्याचा आम्हांला काय उपयोग, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.