कराड – भारताला 1952 साली पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कराडचे सुपूत्र पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांची आज 97 वी जयंती आहे. यानिमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र, त्यांच्या कार्याची भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून योग्य दखल न घेता उपेक्षाच केली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या क्रीडा धोरणाबाबत व ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या सन्मानाबाबतच्या अनास्थेबाबत कुस्तीक्षेत्रासह शौकीनांकडून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
खाशाबा जाधव यांचा जन्म गोळेश्वर (ता. कराड) येथे 15 जानेवारी 1926 रोजी झाला होता. खाशाबा जाधव हे नामवंत पैलवान होतेच. परंतु, 1952 साली ते पहिले ऑलिम्पिक पदक विजेते ठरल्याने त्यांचा भारतीय कुस्तीगीर म्हणून जगभर नावलौकिक झाला. त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
दरम्यान, देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र, ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले; ते पै. खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. 70 वर्षात हजारो खेळाडूंचा सन्मान झाला. मात्र, कराडच्या या सुपुत्रावर अन्यायच झाला असल्याची भावना संपूर्ण कुस्तीशौकीनांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खाशाबा जाधवांचे चिरंजीव रणजीत जाधव यांच्यासह राज्यातील अनेकांनी आजपर्यंत खाशाबांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र स्तरावर सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला आहे, मात्र, अजूनही सरकारला जाग आली नाही. त्यात गुगलने पै. खाशाबा जाधव यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. त्यामुळे मात्र, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून पै. खाशाबा जाधव यांचा योग्य सन्मान कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या या धोरणाबाबत कुस्तीशौकीन व खेळाडूंकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कराड येथील कार्वे नाका येथे असलेल्या स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या स्मृती स्तंभास आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे चिरंजीव रणजीत जाधव, तसेच गोळेश्वरचे सरपंच व स्व. खाशाबा जाधव प्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन करण्यात आले.