करंजगाव – गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी कान्हे येथील एका कंपनीच्या आवारात बिबट्या आल्याचे सीसीटिव्हीत दिसून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 13) दुपारी पाले गावातील डोंगर पठारावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. यामुळे मावळ परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
मावळ तालुक्यातील पाले गावातील पठार डोंगरावर शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लक्ष्मण जानकु भगत हे शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे अचानक आलेल्या बिबट्याने यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे भगत हे भयभीत झाले असून या घटनेचा त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. रात्रीच्यावेळी होणारे बिबट्याचे हल्ले दिवसाढवळ्या होऊ लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने लक्ष्मण भगत यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी (दि. 7) रात्री कान्हे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्या दिसला होता. त्यामुळे या भागातून कामावर जाणाऱ्या कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने अद्याप मनुष्यावर जरी हल्ला केलेला नसला तरी, मानवी वस्तीतील वावर वाढल्यामुळे मावळ वासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतीला पाणी कसे देणार?
मावळ तालुक्यातील बहुतांशी गावात रात्रीच्यावेळी थ्री फेज लाईट येते. त्यानंतरच शेतकऱ्यांना पाण्याची मोटार सुरू करता येते. यामुळे शेतमाल किंवा ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी जावे लागते. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असून त्याच सोबत डोंगरावरील घनदाट झाडीही नष्ट होत आहे. यामुळे वन्य प्राणी लपण्यासाठी ऊसाच्या शेतीचा वापर करतात. रात्रीच्यावेळी पाणी देताना बिबट्या हल्ला करू शकतो, अशी भिती वाटत असल्याने अनेकजण शेतीकडे फिरकत नाहीत. घरातील तीन किंवा चारजण एकत्र शेतात जातात. मात्र दिवसा बिबट्याने हल्ला केल्यामुळे महिला वर्ग दिवसा शेतात जाण्यासाठी घाबरू लागल्या आहेत. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
वन विभागाकडे सापळा लावण्याची मागणी
उर्से, कान्हे, तळेगाव या परिसरातील असलेल्या एमआयडीतील कंपन्यांमध्ये हजारो कामगार काम करतात. सेंकड शीपवरून घरी जाताना त्यांना रात्रीच्यावेळी उशीर होतो. यापैकी बहूतांशी कामगार हे दुचाकीवरून जात असतात. तसेच अनेक लहान मुलेही शाळेत एकटी जातात. तर तीन-चार वर्षाची लहान मुले घराच्या बाहेर खेळत असतात. बिबट्याच्या हल्ल्यामुळे पालक मुलांना एकटे शाळेत पाठविण्यात तयार नाहीत. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर सोडत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसोबतच, शाळकरी मुले आणि कामगारांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे वन विभागाने येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावावेत, अशी मागणी कामगार आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.