मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. चारोटी येथे असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराजवळील पुलावर हा अपघात झाला. या अपघातात दुर्देवाने एकाच कुटूंबातील तिघांचा अंत झाला ज्यात एक वर्ष वयाच्या चिमुकलीचाही समावेश आहे तर, अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाले.
अधिक माहितीनुसार, या अपघातात नरोत्तम छना राठोड (65), केतन नरोत्तम राठोड (32) आणि आर्वी दीपेश राठोड (1) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दीपेश नरोत्तम राठोड (35), तेजल दीपेश राठोड (32), मधु नरोत्तम राठोड (58) आणि स्नेहल दीपेश राठोड (2.5) हे जखमी झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, नालासोपारा पश्चिम येथील राठोड कुटुंबीय भिलाड (गुजरात) येथे जात असताना दुपारी सव्वा वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. गाडीचा चालक दीपक राठोड यांचा अंदाज चुकल्याने पुढे असलेल्या कंटेनर ट्रकला मागच्या बाजूने या कारने जोरात धडक दिली. या अपघातातील जखमींपैकी दोघेजण गंभीर असल्याने त्यांना वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. ओव्हरटॅक करताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.