मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात होणे हे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी दुःखद घटना आहे. या अपघातानंतर विविध स्तरातून त्याच्यासाठी हळहळ केली जात आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पंत दुखापतीतून लवकरात लवकर बरा व्हावा आणि मैदानावर पुन्हा पहिल्यासारखा खेळताना दिसावा, असे वाटत आहे.
30 डिसेंबरला दिल्लीहून रुडकी येथे जात असताना ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. पण ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ऋषभला यातून पूर्णपणे सावरण्यासाठी जवळजवळ सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, ऋषभच्या कठीण काळात भारतीय क्रिकेट बोर्ड त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. ऋषभ पंत यावर्षी आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 16 कोटी रुपये मिळणार होते.
ही रक्कम आता भारतीय क्रिकेट बोर्डाकडून ऋषभला देण्यात येईल. त्याशिवाय बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील 5 कोटी रुपये देणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड ऋषभच्या वैद्यकीय आणि व्यावसायिक गरजांची देखील पूर्णपणे काळजी घेत असल्याचं यातून दिसून येत आहे.