मुंबई- सरलेल्या वर्षात भारतीय शेअर बाजारांनी चार टक्क्यांचा परतावा दिला असला तरी जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमालीचे अस्थिर राहिले. परदेशी गुंतवणूकदारांनी सरलेल्या पूर्ण वर्षात भारतातून 1.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मात्र आगामी भारतीय शेअर बाजारासाठी आशादायक राहण्याची शक्यता अधिक आहे.
सरलेल्या वर्षांत भारतीय रुपयाने खराब कामगिरी केली. रशिया- युक्रेन युध्द सुरू झाल्यामुळे आणि अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे भारतीय रुपयाचे मूल्य कमी झाले. रुपयाचे मूल्य कमी झाल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात केलेल्या गुंतवणूकीवर कमी परतावा मिळतो. अशा अवस्थेत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेऊन डॉलरसंबंधी वित्तीय उत्पादनामध्ये गुंतवणूक केली असल्याचे दिसून येते.
या अगोदर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2008 मध्ये बरीच गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा 2022 मध्ये या गुंतवणूकदारानी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूक काढून घेतली आहे. याच काळात भारतातील किरकोळ गुंतवणूकदार आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे वार्षिक पातळीवर निर्देशांक चार टक्क्यांनी वाढले. जगातील इतर कोणत्याही शेअर बाजारांनी या वर्षात सकारात्मक परतावा दिलेला नाही.
आगामी काळ भारतीय शेअर बाजारासाठी आशादायक राहण्याची शक्यता आहे. कारण भारताचा विकासदर सात टक्के राहणार आहे. तर जागतिक विकास दर चार टक्क्यापेक्षा कमी राहणार आहे. मात्र भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे भारतातील कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त आहेत. अशा परिस्थितीत इतर देशातील कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारताकडे किती लक्ष देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराबरोबरच रोखे बाजारातूनही गुंतवणूक काढून घेतली असल्याचे दिसून येते. 2021 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 25,752 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर 2020 मध्ये 1.7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.