चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण जगापुढे संकट उभे ठाकले आहे. चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. तेथे अवलंबण्यात येत असलेले शून्य कोविड धोरण शिथिल केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात दोन मृत्यूंची नोंद झाली. या मृत्यूंमुळे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गेल्या तीन वर्षांत चीनमध्ये कोविड-19मुळे झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या 5 हजार 237 वर गेली आहे.
आतापर्यंत तेथे एकूण 3 लाख 80 हजार संख्या नोंदवली गेली असून, ही संख्या इतर प्रमुख करोनाबाधित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. पण चीनचे आरोग्य अधिकारी केवळ थेट करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची करोना मृत्यू म्हणून गणना करतात. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना करोना झाल्यास, त्यांच्या मृत्यूची जोखीम वाढते. बहुसंख्य देशांतील करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या रुग्णांचाही समावेश करोना मृत्यूमध्ये केला जातो. आर्थिक व्यवहारातील मोठी घसरण आणि विषाणू प्रादुर्भावाचे अनधिकृत पुरावे मोठ्या लाटेची चिन्हे दर्शवत आहेत. येत्या एक-दोन महिन्यांत या महासाथीची लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोविडचा विषाणू अजूनही पसरत आहे आणि त्यात आणखी उत्परिवर्तनांची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जगभरातील मानवजातीला मोठा धोका आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे भारताला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर आणि लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच, अन्य उपाययोजना करण्याचा रास्त सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे.
जास्तीत जास्त करून रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्याची सूचनाही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी केली आहे. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येते. देशातील 28 टक्के पात्र नागरिकांनी करोनाची वर्धक मात्रा घेतली आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. परंतु इतर 72 टक्के लोकांचे काय? त्यांनी वर्धक मात्रा घ्यावी म्हणून केंद्राने यापूर्वी आग्रह केला होता काय? उलट करोनाची अगोदरची लाट उसळल्यानंतर सरकार या संदर्भात बेफिकीर झाले का, हा खरा प्रश्न आहे. करोनाची पहिली लाट आली तेव्हा बाहेरच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर तातडीने नियंत्रणे घालण्यात आली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी आले आणि ते देशात ठिकठिकाणी जाऊन करोना लाटेचा प्रसार झाला. ही चूक यावेळी होता कामा नये.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 डिसेंबरला एकाच दिवसात दीड लाख प्रवाशांची नोंद झाली. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत 140 टक्के आणि देशांतर्गत प्रवासी संख्येत 26 टक्के वाढ झाली आहे. नाताळच्या सुट्टीच्या काळात गर्दी वाढणार आहे. त्यामुळे तत्काळ तेथे जादा कर्मचारी पाठवून गर्दी नियंत्रण करणे, प्रवाशांची चाचणी घेणे या गोष्टी सुरू होणे आवश्यक आहे. चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्याच्या आणि संशयित आढळणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेत दिल्या गेल्या असल्या, तरी त्याचे पालन होत आहे की नाही, हेही बघितले पाहिजे. भारतात सध्या करोनाचे 3 हजार 408 उपचाराधीन रुग्ण आहेत. परंतु आपण जागरूक न राहिल्यास ही संख्या अनेक पटीने वाढू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात ताबडतोब कृतिदलाची स्थापना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. करोनाच्या विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता असून, राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घ्याव्या अशी सूचना अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरोधात असताना त्याने जबाबदारीचे वर्तन केले होते, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. उलट टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर लवकरात लवकर मंदिरे उघडा, टाळेबंदी शिथिल करा अशा मागण्यांसाठी भाजप आणि मनसेने आंदोलने केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी कठोर उपाययोजना केल्या. याउलट तेव्हा विरोधी पक्षांनी दिखाऊ आंदोलने करणे, प्रसार माध्यमांमार्फत अनावश्यक मुद्दे उपस्थित करणे या गोष्टी केल्या होत्या. या तुलनेत अजित पवारांनी सरकारशी सहकार्याची भूमिका घेतली असून, हे स्वागतार्ह आहे. अजित पवारांची सूचना स्वीकारून सरकारने कृतिदलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, हे बरेच झाले.
जगभरात करोनाचे सरासरी 5.9 लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. भारतात लसीकरण पूर्ण झालेल्या लोकसंख्येचे प्रमाण समाधानकारक असून, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगण्यात येत असले, तरीदेखील भारतात सामाजिक शिस्तीचा पूर्णपणे अभाव आहे. शिवाय आपल्याकडे कोणत्याही प्रश्नात राजकारण शिरते. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फक्त कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून, भारत जोडो यात्रा स्थगित करण्याची विनंती केली, हे आश्चर्यकारक आहे. याचे कारण देशात ठिकठिकाणी जत्रा, यात्रा, मेळावे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठमोठ्या सभा अखंडितपणे सुरू आहेत. त्याबद्दल काहीही न बोलता तत्काळ फक्त राहुल यांना पत्र पाठवणे आणि वर गांधी घराण्याला विशेष हक्क नाहीत अशी टिप्पणी करणे हे आश्चर्यकारक आहे.
देशात सर्वसाधारण सूचना जारी करण्यापूर्वीच आणि सर्व राजकीय पक्षांना उद्देशून नियम जाहीर करण्याअगोदरच, केवळ राहुल यांची यात्रा टार्गेट करणे आणि हे त्यामागील राजकीय हेतू स्पष्ट करणारे आहे. मात्र, राहुल यांनीही तत्काळ आम्ही सर्व नियमांचे पालन करू आणि गरज वाटल्यास यात्रा स्थगित करू, असा पवित्रा घेणे अधिक योग्य होईल. करोनाच्या धास्तीचे शेअर बाजारावर तत्काळ परिणाम झाले. आधीच देशाची आर्थिक प्रगती खुंटली आहे. करोनाचा प्रसार झाल्यास त्याचा आणखी फटका बसू शकतो. म्हणूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी तसेच सामान्य नागरिकांनी पूर्वानुभव लक्षात घेऊन अधिक जबाबदारीने आणि संयमाने वागले पाहिजे.