मुंबई – निर्यात वाढत नसतानाच आयात वाढत असल्यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट दुसऱ्या तिमाहित वाढून राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.4 टक्क्यावर गेली आहे. चालू खात्यावरील तुटीचा हा 37 तिमाहितील उच्चांक आहे. त्यामुळे या आघाडीवर सरकारला वेगात उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
अन्यथा रुपयाच्या मूल्यावर दबाव येऊ शकतो असे समजले जाते. दुसऱ्या तिमाही चालू खात्यावरील तुट 4.4 टक्के म्हणजे 36 अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत ही तूट केवळ 1.3 टक्के म्हणजे 9.7 अब्ज डॉलर इतकी होती. पहिल्या तिमाहीत चालू खात्यावरील तूय 2.4 टक्के इतकी होती.
जागतिक मंदीमुळे भारताची निर्यात वाढत नसतानाच भारताला कच्चे तेल, सोने, खाद्यतेल इत्यादी वस्तू अधिक परकीय चलन मोजून खरेदी कराव्या लागत आहेत. यामुळे आवश्यक आयात कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करीत असू सर्व मंत्रालयांना या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
मात्र आता अमेरिकेतील महागाई कमी होत असल्यामुळे अमेरिकेचे व्याजदर कमी होणार आहेत. अशा परिस्थितीत जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारून भारताची निर्यात वाढण्यास मदत होऊ शकेल. अशा परिस्थितीत चालू खात्यावरील पोट कमी होण्यास मदत होईल.