इस्लामाबाद – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या स्फोटामागे भारताचा हात होता, (Pakistan alleges India was involved in blast outside Hafiz Saeed’s residence) असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. या स्फोटामागे भारताचा हात असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे.
या संदर्भातील पाकिस्तानची भूमिका संपूर्ण जगासमोर ठेवली जाणार आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पंजाब प्रांताचे दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान मेहमूद देखील उपस्थित होते.
गेल्या वर्षी जूनमध्ये लाहोरमधील जोहार भागात हाफिज सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले होते आणि 24 जण जखमी झाले होते. या स्फोटातील दोषींना पुराव्यासह अटक करण्यात आली आहे. म्हणूनच हा विषय संपूर्ण जगासमोर आणला जाणार आहे, असे राणा सनाउल्लाह म्हणाले.
बंदी घातलेल्या तेहरिक ए तालिबान पाकिस्तानला भारताचा पाठिंबा आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी भारत वेगवेगळ्या माध्यमांमधून लक्षावधी डॉलर खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्य मंत्री हिना रब्बानी खार यांनीही भारतावर दहशतवादी कारवायांचा आरोप केला आहे. जगातील कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर जेवढा केला नसेल, तेवढा भारताने केल्याचा आरोप खार यांनी केला.
Rahul Gandhi : पुढील निवडणुकीतही राहुल अमेठीतून लढणार; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा
दहशतवादाच्या अर्थकारणात दोषी आढळलेला हाफिज सईद कोट लखपत कारागृहात 36 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगतो आहे. स्फोट झाला तेंव्हा सईद घरीच होता, असे बोलले जात होते. सईदला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर अमेरिकेने 1 कोटी डॉलरचे बक्षिसदेखील जाहीर केले आहे.