लखनौ :- कॉंग्रेस नेते राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पुढील लोकसभा निवडणूकही लढवणार असल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे नेहरू-गांधी परिवाराचे प्रदीर्घ काळापासून अमेठीशी असणारे नाते टिकवण्यासाठी राहुल प्रयत्नशील असल्याचे दिसते.
राहुल यांनी 2019 मधील लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघांमधून लढवली. केरळच्या वायनाडमध्ये त्यांनी विजय मिळवला. मात्र, उत्तरप्रदेशच्या अमेठीत भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला. अमेठी हा नेहरू-गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानला गेल्याने ती घडामोड कॉंग्रेसच्या दृष्टीने मोठी नामुष्की ठरली.
मागील वेळी पराभव झाल्याने राहुल पुढील निवडणुकीत अमेठीतून लढण्याची राजकीय जोखीम स्वीकारतील का, अशी चर्चा अधूनमधून होत असते. अशात राहुल अमेठीमधून पुढील निवडणूक लढवणार असल्याचा दावा उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय राय यांनी केला.
Lok Sabha : तवांग संघर्षावरून संसदेत गदारोळ; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांनी केला सभात्याग
मागील वेळी पराभव होण्याआधी राहुल यांनी सलग तीन वेळा अमेठीत विजय मिळवला. मागील वेळेप्रमाणेच पुढील निवडणुकीत ते अमेठी आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघांमधून रिंगणात उतरतील, अशी चिन्हे आहेत.