मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. “मेलो असतो तर बर झालं असतं’. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
दरम्यान, आपल्या मनातील याच वेदना मांडण्यासाठी आज उदयनराजे रायगडावर दाखल झाले आहेत. छत्रपतींच्या समाधीजवळ जाऊन आम्ही वेदना मांडणार असून आत्मक्लेष करणार आहोत, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. यावेळी राजगडावरून बोलताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला असल्याचं पाहायला मिळालं.
“असं बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे’, असं म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडलं आहे. उदयनराजे म्हणाले, “काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला’. अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या व्यक्त केल्या.
दरम्यान, यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. “लवकरच एक तारीख ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ!’ अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.
आज सकाळी उदयराजे यांनी रायगडकडे कूच केले. जलमंदिर पॅलेस या निवासस्थानातून निघाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व रायगडकडे ते मार्गस्थ झाले. यावेळी मोठ्या संख्ने समर्थक त्यांच्या सोबत उपस्थित होते.