पुणे -मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा, अशी मागणी गेली अनेक वर्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात येत होती. ही मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केली आहे. त्यांनी लवकरच हा धडा शालेय व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच त्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना पोलीस मित्र संघटनेच्या वतीने बालगंधर्व चौकात श्रध्दांजली वाहिली. यावेळी पाटील यांनी हे आश्वासन दिले. राजेंद्र कपोते पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष, उपायुक्त परिमंडळ 1 चे संदीप सिंह गिल, मुंबईचे पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, संदीप खर्डेकर आदी मान्यवरांच्या हस्ते शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अतिरेकी कसाबला जिवंत पकडताना त्याच्या गाडीत असलेले व कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेले सहायक निरीक्षक अरुण जाधव यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.