सातारा – गेल्या निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने सभासदांची प्रतारणा करण्यापेक्षा पदत्याग करण्याची भूमिका मी घेतली. त्यानंतर विरोधकांनी केवळ खुर्ची उबवण्यातच धन्यता मानत प्रचंड उधळपट्टी केली. त्यामुळेच बॅंक अडचणीत आली, असे शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन व सभासद परिवर्तन पॅनलचे नेते बलवंत पाटील यांनी स्पष्ट केले.
शिक्षक बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “”चेअरमनपदाचा पदभार मी 2015 मध्ये स्वीकारला. त्यावेळी सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याच्या विषयाला आम्ही वचननाम्यात प्राधान्य दिले होते. त्यानुसार नवीन नोकरभरती बंद करून बॅंकेची कर्मचारी संख्या 150 वरून 90 पर्यंत आणायची होती. मी राजीनामा दिला त्यावेळी कर्मचारी संख्या 125 होती.
नंतर मात्र कर्मचारी संख्या कमी करण्याच्या धोरणाला हरताळ फासण्यात आला. नेते व संचालकांच्या मतलबी धोरणामुळे आज बॅंकेत नियमित 170 कर्मचारी असून, 30 कर्मचारी विविध एजन्सीजमार्फत कार्यरत आहेत. एकूण कर्मचारी संख्या 200 आहे. एका कर्मचाऱ्यावरील निवृत्तीपर्यंतचा खर्च तीन कोटींवर जातो. कर्मचारी संख्या कमी झाली असती तर सभासदांच्या कर्जावरील व्याज मोठ्या प्रमाणात कमी करता आले असते. परंतु, नेते व संचालकांमुळे तसे झाले नाही.”
मी माझ्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात कर्जावरील व्याजदर तीन वर्षांत सात वेळा कमी केला. व्यवस्थापन खर्चातील बचतीमुळे अंदाजे तीन कोटी रुपये व्याजदर कमी करण्यासाठी मिळाले. ज्यावेळी व्याजदर आणखी कमी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी नेते व संचालकांकडून नोकरभरतीसाठी आग्रह व दबाव वाढू लागला. या दबावापुढे न झुकता मी चेअरमनपदाचा राजीनामा दिला. निवडणूक जिंकण्यासाठी वारेमाप आश्वासने देणे आणि ती न पाळणे मला गैर वाटते.
व्याजदर कमी करण्याचा विषय असो की नोकरभरती बंद करण्याचा विषय असो बॅंक व सभासदांच्या हिताचा विचार न करता नेमके उफराटे काम नेते व संचालकांनी केले. माझ्या त्यावेळच्या भूमिकेमुळेच आज मी आमचे नेते संभाजीराव थोरात आणि समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्याबरोबरीने उजळ माथ्याने प्रचारासाठी फिरत आहे, असेत्यांनी सांगितले. त्यावेळी मी घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे बलवंत पाटील म्हणाले.