सातारा – जनतेने ज्यांना नगरपरिषदेकरीता कायमस्वरुपी रिटायर्ड केले आहे, त्यांनी सातारा विकास आघाडीने आता रिटायर्मेंट घ्यावी, असा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांनी आता रियल इस्टेटचा व्यवसाय मंदावला असल्यास चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरु करावा, असे घणाघाती प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिले.
प्रशासकीय राजवट लागून आता जवळपास एक वर्ष होत आहे. नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी साविआ काहीच करीत नाही, अशी बोंब मारणारेच कासचे जलपूजन केले त्यावेळी साविआचा संबंध काय अशी गरळ ओकत होते. त्याचपध्दतीने घंटागाडयांच्या अचानक बंद पुकारण्याने माजी उपनगराध्यक्षांनी केलेल्या मध्यस्थीवर आता यांचा संबंध काय, हे कशाला लुडबुड करतायत, यांचा स्वार्थ आहे अशी दोन्ही हाताने बोंब ठोकत होते.
आता तेच साविआने लक्ष द्याला पाहिजे असे सल्ले देत आहेत. म्हणजेच प्रशासकीय राजवटीत नागरीकांची कामे होत नाहीत असे त्यांचे अप्रत्यक्ष म्हणणे आहे. नथीतून तीर मारण्याचा त्यांचा प्रकार जुना आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारे आमदार सैरभैर झाले आहेत. त्यांना जनतेमधून थारा मिळणार नाही याची खरी भीती वाटत असल्याने कोणत्याही ठिकाणी आमच्यावर शब्दफेक केल्याशिवाय किंवा आगंतुक सल्ले दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही.
कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमाने कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. त्यांच्यासारखे निदान आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे तरी नाही, असा पलटवार त्यांनी केला आहे. निष्ठा दाखवायला लागत नाहीत. त्या आपोआप प्रदर्शित होत असतात. तुम्ही भाजपमध्ये असताना गेली अडीचवर्षे टिमकी मात्र कोणाची वाजवत होता हे जनतेला माहिती आहे. आता विस्तार असल्याने यांची निष्ठेची नाटके सुरु झाली आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्ही हत्तीच्या चालीने चाललो आहोत.
भुंकणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. जे येतील त्यांच्या बरोबरीने नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ज्यांच्या हातात अनिर्बंध सत्ता होती त्यांच्या काळात सातारा शहर पेन्शनरांचे शहर बनले. पेन्शनर्स सिटीचे स्मार्ट सिटीत रुपांतर करण्याचे आमचे बहुतांशी प्रकल्प यशस्वी झाले आहेत. ही सर्व कामे नागरिकांच्या हितासाठी केली असल्याने, नागरिकांची साथ कोणाला मिळेल हे येणारा काळच ठरवेल, असेही उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.