नवी दिल्ली : काही दिवसापूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रसरकडून या संघटनेवर बंदी देखील घालण्यात आली आहे. दरम्यान, आता या संघटनेसंदर्भात एनआयए चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत प्रभू श्रीरामाचे बांधण्यात येणारे मंदिर पडून पुन्हा त्याच जागेवर बाबरी मशिद बांधण्याचा पीएफआयचा कटअसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. यासंदर्भात इतर मुस्लिमबहुल देशांमधील सदस्यांसोबत या संस्थेचे कार्यकर्ते संपर्कात होते असा दावा सरकारी वकिलांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा कट रचला होता अशी माहिती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मशिद पुन्हा उभारण्याचा डाव असल्याचे एनआयच्या तपासातून समोर आलं आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील अनेक ठिकाणी केलेल्या छापेमारीत शेकडो पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. त्यापैकी पाच प्रमुख संशयित आरोपींच्या तपासामध्ये ही माहिती समोर आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे. या तपासात अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्यामधून देश विघातक कृत्यांमध्ये ही संस्था सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०४७ पर्यंत संपूर्ण देशाला मुस्लिम राष्ट्र करण्याचं मॉड्यूल या संघटनेनं बनवलं होतं यासंदर्भातील पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. या तपासामध्ये बरीच माहिती समोर आली असून आरोपींचा ताबा मिळवण्यासंदर्भातील न्यायालयातील युक्तीवादामध्ये सरकारी पक्षाने यासंदर्भातील माहिती दिली.
पीएफआयचे पाच संशयित आरोपी एटीएसच्या ताब्यात आहेत. हे पाचही आरोपी परदेशात देखील जाऊन आले आहेत. त्यांच्या खात्यावर परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे देखील जमा झालेले आहेत. या सगळ्या सभासदांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपचा अॅडमीन पाकिस्तानमधील असल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये बाकी मुस्लिम राष्ट्र आणि भारतातील हे मुस्लिम सदस्य असा यांचा एकत्रित पद्धतीचा कट होता.