मुंबई : भाजपने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूकीतून माघार घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यावरून शिंदे गट-भाजपा आणि ठाकरे गटात अजूनही शाब्दिक चकमक सुरूच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.
अजित पवार म्हणाले,’काल एक चांगला निर्णय झाला. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीमधील पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. तसेच राज ठाकरेंनी पत्र लिहिलं होत.’
ते पुढे म्हणाले,’भाजपाने त्यासंबंधी सकारात्म भूमिका घेतली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्रात जर असे पायंडे पडले तर ते चांगलं आहे, पण यावर काहीजण टीका करत आहेत. आता चांगलं झाल्यावर कशाला टीका करायची. शब्दाने शब्द वाढत जातो. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं माझं सर्वच राजकीय पक्षांना आवाहन आहे. वेगळा अर्थ काढून उगाच कोणाला तरी डिवचण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न करु नये हे माझं स्पष्ट मत आहे.’ असेही ते म्हणाले.