नगर – जिल्ह्यात यंदा मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी पावसाचा मुक्काम कायम आहे. काही केल्या पाऊस थांबायला तयार नाही. आताही 2 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या अतिपावसाने पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 128 टक्के म्हणजेच 577 मिमी इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नगर शहरातील नागापूर परिसरात 19.3 मिमी, नेवासा खुर्द शहरात 22.8 मिमी, चांदा मंडलात 20.8 मिमी, वडाळा मंडलात 17.3 मिमी, राहुरी तालुक्यातील वांबोरी मंडलात 19.3 मिमी, संगमनेर तालुक्यातील आश्वी व शिबलापूर मंडलात प्रत्येकी 14.3 मिमी, तर घारगाव आणि डोळासणे मंडलात प्रत्येकी 23.8 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. पिंपरणे मंडलात 14.3 मिमी पाऊस पडला. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा मंडलात 18 मिमी तसेच श्रीरामपूर तालुक्यातील लोणी मंडलात 27.5 मिमी आणि बाभळेश्वर मंडलात 27.5 मिमी पाऊस पडला.
पंचनाम्यांचे काम सुरू
आतापर्यंत पडलेल्या या पावसाने पिकांचे मात्र मोठे नुकसान केले आहे. हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. हजारो घरांची पडझड झाली आहे. तसेच पशुधनालाही फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. पंचनामे पूर्ण केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
नागरिकांना दिला इशारा
जिल्ह्यात 2 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत. या काळात जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचना दिल्या आहेत.