गांधीजी अहिंसेचे पालन करीत होते पण त्यांची अहिंसेची वाट अत्यंत उंचीची होती. त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ शारीरिक हिंसेचा विचार केला नाही. त्या पलीकडे मानसिक हिंसेलाही तेवढेच महत्त्व दिले. कायिक, वाचिक, मानसिक हिंसा त्यांना नको होती. मनात देखील हिंसेचा विचार नको आणि मुखावाटे येणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून देखील कोणाचे मन दुखविणे नको. गांधीजी अहिंसा पराकोटीची जपत होते. त्यामुळे ही पाऊलवाट वर्तमानात एकमेकावर होणारे अत्यंत दर्जाहीन हल्ले पाहिले की गांधीजींची उंची किती मोठी होती, हे अधोरेखित होते.
महात्मा गांधी यांनी अखंड जीवनभर अंहिसेचा विचार मस्तकी घेतला त्या अंहिसेचा आज बळी जाताना दिसतो आहे. मोठी माणसं जे विचार पेरतात, तो विचार पुढे न्यायचा असतो. संकट जेव्हा येते तेव्हाच त्यांनी पेरणी केलेल्या तत्त्वांची अधिक गरज असते. गांधीजी गेले हे अवघ्या जगासाठी धक्कादायक होते. त्यांचे जाणे नैतिकतवरील हल्ला होता का..? त्यांचा मृत्यू हा भारतासाठी अधिक अंधाराचे साम्राज्य निर्माण करणारा होता. त्यामुळे पंडित नेहरू म्हणाले होते की, प्रकाश आपल्यातून निघून गेला हा प्रकाश नैतिकतेचा, मानवतेचा होता आणि तो प्रकाश अविवेकाच्या अंधारात चाचपडणाऱ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच चळवळींना दिशादर्शक होता.
गांधी म्हणजे विवेक, शहाणपण आणि सद्सद्विचाराचे नाव होते. त्यामुळे गांधीच्या विचारापासून दूर जाणे म्हणजे माणूसपण गमावणे होते. त्यांच्या विचाराचे बोट सोडल्यावर काय झाले आहे हे आपण आजही अनेक क्षेत्रात पाहात आहोत. भोवताल युद्धाच्या खाईत लोटला जाणे. शातंतेच्या वाटांवरती यद्धाचे ढग दाटून येणे, मत्सराची स्पर्धा वाढते आहे. मानवी जीवनातील निकोपता हरवली आहे. इमारतीच्या उंची वाढता आहेत आणि त्याचवेळी माणसांच्या उंची हरवत चालल्या आहेत.
आपल्या भोवती आज छोट्या माणसांच्या सावल्या मोठ्या पडू लागल्या आहेत. त्या सावल्या ऱ्हासाचे प्रतीक आहे. त्यामुळे जगात आजही अनेक राष्ट्रप्रमुखांना गांधी विचाराचा प्रकाशच अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी अधिक योग्य वाटू लागला आहे. हिंसेच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येकाला अखेरच्या क्षणी आपली वाट चुकीची होती असेच वाटत राहाते. त्यामुळे शस्त्राच्या स्पर्धेने निघालेल्या आणि महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या ओबामांना देखील गांधी विचारांची भूरळ पडते कारण हाच मार्ग मानवी कल्याणाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
गांधी कोण होते? ज्यामुळे जगावर त्यांच्या विचाराचे साम्राज्य प्रस्थापित करता आले. हे ना सत्ताधारी होते. ना कोणत्या राजकीय पक्षाचा प्रमुख होते. सत्तेचा प्रभाव पडावा असे त्यांच्या हाती काहीच नव्हते. मात्र गांधी हा माणूस नैतिकतेच्या सर्वोच्च उंचीवर होता. मानवी मूल्यांची वाट चालणारा निर्मिळ अंतकरणाचा पांथस्थ होता. जेथे जेथे मानसिक संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा हा माणूस केवळ मानवी मूल्यांच्या सोबत राहिला. जेव्हा धर्म, पंरपर, प्रथा यांच्यामुळे मानसात भेद पडू लागले तेव्हा हा माणूस धर्माच्या विरोधात उभा ठाकला. त्यांच्या जगण्यावर इतर कशाचाही प्रभाव पडला नाही. त्यांना मोह झाला नाही आणि अपेक्षाही त्यांनी धरल्या नाही. केवळ माणसांत माणूसपण पाहाणारी मूल्यच प्रभाव टाकू शकली. त्यामुळे गांधी विचार हा जेव्हा व्यक्तीच्या विचार प्रक्रियेत गोंधळलेली स्थिती येते तेव्हा तेव्हा समाज आणि व्यवस्थेला दिशादर्शक ठरतो.
गांधीजी म्हणत असत की, गांधीवाद नावाचा कोणताही वाद नाही. माझेकडे सांगण्यासारखे काहीच नाही. माझे जीवन हाच विचार आहे. त्यांनी आपल्या जीवनात निवडलेली वाट कृतीशीलतेची होती. जे अंतर्मनाला पटते तेच ते करीत होते. ते ज्या पाऊलवाटेने जात होते ती वाट षडरिपूनी अंधारलेपण आणले असेल तर त्यावर मात करण्यासाठी प्रकाशाची वाट होती. त्यामुळे ते म्हणाले होते, माझ्याकडे सागंण्यासारखे जे आहे ते म्हणजे सत्य आणि अंहिसा. ही मूल्येच उंच शिखरासारखी अनंतकाळापासून मार्गदर्शक आहेत. हा विचार घेऊन जी माणसं चालत राहातात ती वैश्विक आणि व्यापक बनतात. गांधीजींनी या मूल्यांचा विचार संपूर्ण जीवनभर अनुसरला. त्यामुळे ते अखंड विश्वावरती अधिराज्य करू शकले.
हा माणूस या मूल्यांचा इतका गंभीरपणे विचार करीत होता, की ती मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान बनले होते. त्यांच्या व्यक्तिगत मूल्यांचा प्रभाव त्यांच्या सामाजिक जीवनात देखील कायम होता. सत्याची धारणा त्यांच्या राजकीय जीवनातही सुटली नाही. वर्तमानात राजकीय जीवनात सत्तेचा धारणा प्रभावी होत असल्याने त्यात सत्याचा लवलेशही सामान्य माणसांना दिसत नाही. त्यामुळे राजकीय पक्ष, त्यांच्या चळवळी सामान्यांना आपल्या वाटत नाही. राजकीय पक्ष बोलतात, आश्वासन देतात; पण तो निवडणुकीचा जुमला म्हणून देशातील नागरिकांना फसविले जाते. ते फसविणे, खोटी आश्वासने देणे हे अनैतिकच आहे. असे फसविणे हे गांधीजीच्या राजकीय जीवन प्रवासात दिसत नाही. त्यांच्या या नैतिक प्रवासामुळे इंग्रज राजसत्तेला देखील धाक होता.
शस्त्राच्या धाकापेक्षा गांधीजीच्या नैतिकतेचा आणि मूल्यांचा अधिक धाक होता. शस्त्राच्या लढाईत इंग्रजानी अनेकांना पराभूत केले; पण निशस्त्र असलेल्या या नैतिक साधनाच्या लढाईत इंग्रज जिंकू शकले नाहीत. गांधीजी चलेजाव चळवळी दरम्यान तुरूगांत होत. ते तुरूंगात असताना समाजात मात्र दंगा सुरू होता. या निर्माण झालेल्या परिस्थितीला गांधी जबाबदार आहेत, असे ब्रिटीशांना वाटत होते. ते तसे बोलून दाखवत होते. त्यावेळेचे जनरल स्मटस यांनी मात्र त्यांच्याच सरकारवरती तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
महात्मा गांधी हे महापुरूष आहेत. गांधी हे फार महान आहेत. खरेतर स्मटस हे ब्रिटीश सरकारचे प्रतिनिधी होते, तरी या माणसाला गांधीजींमध्ये महापुरूषत्व दिसले. शत्रू पक्षालाही नाव ठेवावे लागेल, असे गांधीजीकडे काहीच नव्हते. मात्र गांधीजींचा विचार जेथे स्वतःच्या स्वार्थाला आडवे येत असतील तेव्हा त्यांचा द्वेष करण्यापलीकडे आपल्या हातात दुसरे असते तरी काय? त्यामुळे द्वेष करणारी माणसं स्वार्थ्यातून द्वेष करीत होती. गांधीजींचा समग्र प्रवास हा जीवन मूल्यांचा होता. त्यामुळे इंग्रजाच्या अनेक अधिकारी, नेत्यांनाही त्यांच्यात माणूस दिसला आणि तो त्यांनी प्रामाणिकपणे नमूद देखील केला आहे.
गांधीजी अखंड जीवनात अत्यंत उच्च मूल्यांचा स्वीकार करीत जगत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये जगातील अनेकांना येशूची करूणा दिसली. सतांचा विवेक आणि माणूसपण दिसले होते. राग, लोभ, मद, मत्सर, अहंकाराचा त्यांना स्पर्शही झाला नाही. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर जगप्रसिद्ध वैज्ञानिक आइन्स्टाइन श्रद्धांजली वाहताना म्हणाले होते, गांधी नावाचा एक हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरला होता यावर पुढची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही. या शब्दात गांधीजीना श्रद्धांजली वाहिली होती. यावरून त्यांचा मार्ग किती कठीण होता हे अधोरेखित होते आणि त्याच बरोबर ते जे जगत होते ते मूल्ये किती उंचीची होती ते प्रतिबिंबीत झाले. त्यामुळे राजकारण, समाजकारणात राहूनही या माणसांने कधीच हिंसेचा विचार केला नाही. स्वतःवरती टीका झाली तरी त्यांनी टीकाकारांचा द्वेष केला नाही.
एकदा त्यांच्यावरती टीका करणाऱ्या एका इंग्रज अधिकाऱ्यांने सुमारे तीन पाने भरून अत्यंत खरमरीत टीका करणारे पत्र लिहिले. ते पत्र त्यांच्या स्वियसहाय्यकांनी त्यांच्या हाती दिले. त्यांनी ते वाचले आणि त्या पत्राला लावलेली टाचन काढून घेत त्या पत्राला कचरापेटी दाखविली. खरेतर स्विय सहायक यांच्या मते त्या पत्राला कचरापेटीत न टाकता खरमरीत उत्तर द्यायला हवे होते. पत्र कचरापेटीत टाकल्यावरती त्यांनी गांधींना विचारले की, ते पत्र कचरापेटीत का टाकले? तर गांधींनी उत्तर दिले, त्या पत्रात केवळ टाचनच महत्त्वाची होती बाकी काही नाही. त्यांचा दृष्टिकोन किती वेगळा होता हे त्यातून जाणवते. आज आपण एकमेकांवर टीका सहन न होणारी दृश्ये पाहिली की गांधी किती मोठे होते, हे सहज लक्षात येते.
गांधी अहिंसेचे पालन करीत होते; पण त्यांची अहिंसेची वाट अत्यंत उंचीची होती. त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ शारीरिक हिंसेचा विचार केला नाही. त्या पलीकडे मानसिक हिंसेलाही तेवढेच महत्त्व दिले. कायिक, वाचिक, मानसिक हिंसा त्यांना नको होती. मनात देखील हिंसेचा विचार नको आणि मुखावाटे येणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून देखील कोणाचे मन दुखविणे नको. गांधीजी अहिंसा पराकोटीची जपत होते. त्यामुळे वर्तमानात एकमेकांवर होणारे अत्यंत दर्जाहीन हल्ले पाहिले की गांधीजींची उंची किती मोठी होती हे अधोरेखित होते. त्यामुळे गांधीजींबद्दलचे आइन्स्टाइन यांनी काढलेले उद्गार किती रास्त होते हे लक्षात येईल.
गांधीजींचा प्रवास माणूस म्हणून होता. त्या प्रवासाच्या वाटेने आपण चालू लागलो तर त्यांना अपेक्षित असलेल्या स्वराज्याच्या, रामराज्याच्या दिशेने जाता येईल. अन्यथा अंधारून आले आहेच. तो अंधार अधिक घट्ट होईल इतकेच. व्यक्तिगत जीवन आणि जगाला शांततेसाठी गांधी विचाराशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. गांधी म्हणजे मूल्य, विवेक आणि सद्विचार आहे त्यामुळे या विचाराची जोवर समाजाला गरज आहे तोवर गांधी आपल्या भोवती असणार आहे. त्यांचे स्मरण जयंती, पुण्यतिथी पुरतेच नाही, तर मूल्यांच्या वाटेवरून चालताना सतत होत राहाणार आहे.
– संदीप वाकचौरे