“”आज शाळेत दाखवलेला लघुपट कसा वाटला तुम्हाला?”
“”ह्या! मला तर खोटं खोटं काही दाखवत आहेत असेच वाटले.”
“”मग काय तर! आपण अभ्यास करावा म्हणून काहीही दाखवायचे का?”
“”काय तर म्हणे? मानवी संगणक शकुंतला!”
अनय, प्रणव, मिहीर, सानवी, तन्वी सगळेच तावातावाने आपापले मत मांडत होते. मुलांचा इतका आवाज का चढला आहे हे पाहायला मिहीरचे बाबा बाहेर आले आणि न राहवून त्यांनी “काय झाले’ म्हणून विचारलेच. मग काय प्रत्येक जण अहमिकेने सांगू लागला. “”अरे, जरा शांत व्हा आणि एकेकाने सांगा बरं, मला काहीच कळत नाही”, मिहीरचे बाबा वैतागून बोलले.
“”काका, आज आम्हाला वर्गात एक लघुपट दाखवला, शकुंतला देवी यांच्यावर. आम्हा सगळ्यांनाच असे वाटते की शकुंतला देवींची गोष्ट खोटी आहे. म्हणे आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून हा लघुपट होता.” प्रणवने तावातावाने मत मांडले.
“”हो ना! आम्हाला खरं काय अन् खोटं काय कळत नाही का? एवढे वेगवान गणिते कधी सोडवता येतील का?” कधी नव्हे तन्वीसुद्धा चिडचिड करत होती.
“”अच्छा! कळलं मला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. तुमचे तीन मुद्दे आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे शंकुतलादेवी खऱ्याच होत्या का? तर हो. 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची जगभरात ओळख मानवी संगणक अशीच होती. त्यांनी गणितातल्या गमती जमती, कोडी यांचबरोबर गणित आवडीचा विषय व्हावा म्हणून पुस्तकेही लिहिली आहेत.”
“”बाबा, त्या होत्या हे मान्य करता येईल पण एवढी पटापट आकडेमोड! ते नाही पटत.” मिहीरच काय सगळी मुलं अजूनही साशंकच होती.
“”हा झाला तुमचा दुसरा मुद्दा. अरे या त्यांच्या कौशल्यामुळेच तर त्यांना मानवी संगणक म्हटले गेले ना! त्या संगणकापेक्षाही जलद आकडेमोड करायच्या.”
“”हो! त्या लघुपटात दाखवले की त्यांनी संगणकाच्या आधी दोन तेरा अंकी संख्यांचा गुणाकार केला. शिवाय एका आठ अंकी संख्येचे घनमूळ आणि नऊ अंकी संख्येचे सातवे मूळ पण त्यांनी संगणकाच्या आधी काढले. पण काका हे कसे शक्य आहे? झटपट काम होण्यासाठी संगणकाचा उपयोग केला जातो ना?” प्रणवने माहिती देत विचारले.
“”आता तू तिसऱ्या मुद्द्यावर आलास बघ. लघुपट दाखवायचे कारण काय होते तुम्हाला प्रेरणा मिळावी हो ना. काय प्रेरणा मिळेल सांगा बरं?”””कसली प्रेरणा अन् कसलं काय? इतकी वेगवान आकडेमोड आम्हाला करण शक्यच नाही.” सानवी पुटपुटली.
“”बरोबर सानवी. शकुंतला देवींसारखी जलद आकडेमोड एखादे वेळेस नाही जमायची सगळ्यांना. ही तर त्यांच्या मेंदूची अफाट क्षमता होती. नैसर्गिक वरदानच मिळाले होते त्यांना. पण नुसते वरदान असून उपयोग नाही, त्यामागे कष्टही आहेत.” मिहीरचे बाबा समजावत बोलले.
“”पण बाबा, शाळेत न जाताही त्यांना कसे काय गणित येत होते?”
“”अरे मिहीर, त्या शाळेत नाही गेल्या. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना मिळालेली ही देणगी ओळखून त्यांना अंकशास्त्र शिकवले होते. मी तर असेही वाचले होते की, त्या पाच वर्षांच्या असल्यापासून तोंडी आकडेमोडीचा सराव करायच्या. छान पाठांतर झाले, विषय समजला की तुमच्या ते लक्षात राहते ना. मुद्दाम ताण देऊन आठवावे लागत नाही. तसेच काहीसे.”
“”अच्छा! जसे पाढे पाठ असले की नकळत पटकन गुणाकार होऊन जातो तसेच काहीसे त्यांचे होत असेल.”
“”बरोबर आहे प्रणव तुझे. मेंदूमध्ये एकदा अशा गोष्टींची नोंद झाली की त्या नाहीशा होत नाहीत. उलट जर सतत सराव करत राहिलो तर क्षमता अजून वाढत जाते.”
“”म्हणून आम्हाला शाळेत गणिते सोडवायचा सराव करा असे नेहमी सांगतात तर!” तन्वी हळूच बोलली.
“”मग आहे ना प्रेरणादायी लघुपट! आता पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रयत्न करा. आवडेल तुम्हाला.”
बालमित्रांनो, तुम्हीपण शकुंतला देवी यांच्याप्रमाणेच रामानुजन आणि इतर गणितज्ज्ञांचे लघुपट, सिनेमे पाहायचा प्रयत्न करणार ना?
– विशाखा गंधे