मुंबई – भारतातील आणि परदेशातील महागाई कमी होत असल्यामुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे निर्देशांकाची आगेकूच चालू आहे. आज सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 60 हजार अंकांच्या पुढे गेला.
बाजार बंद होताना सेन्सेक्स कालच्या तुलनेत 417 अंकांनी वाढून 60,260 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 119 अंकांनी म्हणजे 0.67 टक्क्यांनी वाढून 17,944 अंकावर बंद झाला.
बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, एअरटेल, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर महिंद्रा, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रीड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. विशेष म्हणजे चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशातील निर्देशांक सकाळी कमी होऊनही भारतीय शेअर बाजारात मात्र खरेदीचे वारे जोरात वाहत होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल तब्बल 1,376 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
एक महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, भारतातील किरकोळ आणि घाऊक किमतीवरील आधारित महागाई कमी झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील महागाई कमी झाल्यामुळे अमेरिका व्याजदरात वाढ करणार नाही असे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना वाटत आहे.
भारतीय विकास दर जगातील सर्वात जास्त विकास दर असणार आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्यास भारतीय शेअर बाजारातून आपल्याला चांगला परतावा मिळेल असे या गुंतवणूकदारांना वाटत आहे. गेल्या एक वर्षापासून परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे भारतातून अंग काढून घेत होते. मात्र आता गेल्या एक महिन्यापासून हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी हे खरेदी चालूच ठेवल्याचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकामध्ये एकतर्फी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.