मुंबई – राज्यात सत्ताबदल होऊनही भाजपच्या गोटात आतापर्यंत फारसा उत्साह दिसला नाही. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एकप्रकारे पक्षातील खदखद उघड केली. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं, असे ते म्हणाले. ते वक्तव्य मोठ्या चर्चेचा विषय बनले.
पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये बोलताना पाटील म्हणाले, भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपल्या सर्वांना दु:ख झाले. पण, ते पचवून आपण पुढे गेलो आहोत. फडणवीस यांनी याआधी मुख्यमंत्रिपद भुषवले.
आता केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाला. त्यानंतर विविध प्रकारच्या चर्चांना तोंड फुटले. मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने भाजप नाखुष असल्याचा कयासही बांधला जाऊ लागला. मोठी चर्चा सुरू झाल्याने भाजपने तो व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. नव्या सरकारमध्ये फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील असे मानले जात होते. मात्र, भाजपने सगळ्यांनाच चकित करून शिंदे यांच्याकडे धुरा सोपवली. ती घोषणा फडणवीस यांनीच केली.
त्यावेळी त्यांनी स्वत: सरकारबाहेर राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, काही तासांतच फडणवीस उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती समोर आली. ती जबाबदारी फडणवीस यांनी स्वीकारावी यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला किंवा त्यांची मनधरणी केली अशा चर्चाही त्यावेळी रंगल्या.