संयुक्त राष्ट्र – जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये चीन आणि भारत हे देश आघाडीवर आहेत. सध्या जगात चीनची लोकसंख्या सर्वाधिक असून पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. मात्र, आता 2023 पर्यत भारताची लोकसंख्या ही चीनपेक्षा अधिक होणार आहे, असे संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. येत्या वर्षभरात भारत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने सोमवारी एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, नोव्हेंबर 2022च्या मध्यापर्यंत जगातील लोकसंख्या आठ अब्ज होण्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक लोकसंख्या ही आशिया खंडात असणार आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 61 टक्के लोकसंख्या आशिया खंडात आहे.
आशिया खंडात 4.7 अब्ज लोकसंख्या आहे. त्यानंतर आफ्रिका खंडात 1.3 अब्ज लोकसंख्या वास्तव्य करते. जगातील लोकसंख्येच्या अनुषंगाने हा वाटा 17 टक्के इतका आहे. त्याशिवाय युरोपमध्ये 75 कोटी म्हणजे 10 टक्के लोकसंख्या आहे. तर, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये 65 कोटी लोकसंख्या आहे. तर, उत्तर अमेरिकेत 37 कोटी आणि ओसिनियामध्ये 4.3 कोटी लोक वास्तव्य करत आहेत.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटनीओ गुटेरेस म्हणाले, जगातील लोकसंख्या ही 1950 नंतर आतापर्यंतची सर्वात धीम्या गतीने वाढत आहे. जगातील लोकसंख्या ही वर्ष 2030 पर्यंत 8.5 अब्ज इतकी होईल. वर्ष 2050 पर्यंत जगातील एकूण लोकसंख्या 9.7 अब्ज इतकी होईल. तर 2080 मध्ये जगाची लोकसंख्या 10.4 अब्ज इतकी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘अग्निपथ’बाबत संसदीय समितीची बैठक; सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली माहिती…
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, अनेक विकसनशील देशांच्या जन्मदरात घट झाली आहे. येत्या काही वर्षांत आठ देशांची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. यामध्ये कांगो, इजिप्त, इथियोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपाइन्स आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे.
चीनच्या लोकसंख्येत घट
2019 नुसार सध्या चीनची लोकसंख्या 1.44 अब्ज आहे. दुसऱ्या स्थानावर भारत असून 1.39 अब्ज लोकसंख्या आहे. जगातील एकूण लोकसंख्येत चीनचा वाटा 19 टक्के आणि भारताचा वाटा 18 टक्के आहे. एका अहवालानुसार, वर्ष 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होणार आहे. चीनच्या लोकसंख्येत वर्ष 2019 ते वर्ष 2050 या कालावधीत 3.14 कोटी म्हणजे 2.2 टक्क्यांनी घट होणार आहे.
पाच आमदारांचा गोवा कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न…