नवी दिल्ली – रवीचंद्रन अश्विनला जर कसोटी संघातून सातत्याने वगळले जाते तर मग टी-20 संघातून अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीला का वगळले जात नाही, असा परखड सवाल माजी कर्णधार व महान गोलंदाज कपिल देव यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही काळातील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर कोहलीचा वाटा काय आहे. त्याला जर सातत्याने अपयश येत असेल तर योग्य वेळी नवोदित खेळाडूला संधी देणे निवड समितीचे कर्तव्य आहे.
कसोटी संघाची जेव्हा निवड करतात तेव्हा अश्विनला सातत्याने बाहेर बसवले जाते. परदेशातील वातावरणात अश्विन फारसा प्रभाव पाडू शकणार नाही असे सांगितले जाते मग तोच न्याय कोहलीच्या बाबतही हवा, असेही कपिल म्हणाले.
इंग्लंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात पराभव झाला असला तरी, भारतानं 2-1 अशा फरकानं टी-20 मालिका जिंकली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी सामना करत असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 मालिकेतही मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. पहिल्या टी-20 सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. परंतु, अखेरच्या दोन्ही टी-20 सामन्यात तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या टी-20 मध्ये सामन्यात तो एक धाव करून माघारी परतला. तर तिसऱ्या सामन्यात त्याला 11 च धावा करता आल्या.