मुंबई – भारतीय संघाचे नेतृत्व आजवर केलेल्या विविध खेळाडूंमध्ये सौरव गांगुली सर्वोत्तम होता, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. शुक्रवारी गांगुलीने पन्नासाव्या वर्षांत पदार्पण केले. त्याबद्दल सचिनने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अपले मत मांडले.
गांगुलीकडे नवोदित तसेच संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये चांगला समन्वय तयार करण्याचे कसब होते. सामन्याची परिस्थिती कितीही बिकट असो त्याने त्याचे धैर्य कधीही सोडले नाही. त्याने प्रत्येक खेळाडूच्या त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत सतत प्रोत्साहन दिले. त्याचा हाच स्वभाव मला खूप भावला, असेही सचिन म्हणाला.
दरम्यान, गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये 113 सामने खेळले असून, त्याने 188 डावांमध्ये 42.2 च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 311 सामने खेळून 300 डावांमध्ये 41.0 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 32 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट आहेत.
तसेच सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांची भागीदारी केली आहे. त्यांनी एकत्र 176 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी जगातील सर्वाधिक 8227 धावांची भागीदारी केली आहे.