बर्मिंगहॅम – आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्याने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी पुढील काळात होत असलेले सर्व कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत.
गेल्या वर्षीच्या या मालिकेतील इंग्लंडविरुद्धची अखेरची कसोटी करोनाच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आली होती. या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर होता. मात्र, ही कसोटी गमावल्यामुळे ही मालिका बरोबरीत सुटली. त्याचा तोटा आता आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत झाला असून आता येत्या वर्षअखेरपर्यंत होत असलेल्या सर्व कसोटी भारताला जिंकाव्याच लागणार आहेत.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गेल्या वर्षीच्या पहिल्याच मोसमात भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र, त्यावेळी न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यावर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी सुमार कामगिरीमुळे न्यूझीलंड या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडलाही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.
आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकात स्थान मिळवावे लागणार आहे. भारतीय संघ इंग्लंडकडून पराभूत झाल्यामुळे यंदाच्या मोसमात होत असलेल्या सहा कसोटी सामन्यांपैकी किमान पाच सामने जिंकावे लागतील. यंदाच्या मोसमात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4, तर बांगलादेशशी 2 कसोटी खेळणार आहे.