मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे, या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर आता अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून “मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही” अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “चाळीस च्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठे ही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही. अजून किती स्पष्ट सांगायचं. पूर्वी राजा वेषांतर करून स्वतः बद्दल ची मत जाणून घ्यायचे एकदा तस करून बघा जनतेच्या भावना नक्की समजतील, मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही.”
याआधी, संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरेवर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “असली गुहाटीत नकली “वर्षा” वर आणि सेक्युलर गॅस वर.”
दरम्यान, राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आपण राजीनामा देण्यास तयार असून कोणत्याही शिवसेना आमदाराने माझ्याकडे यावं. त्यांनी मला सांगावं तुम्ही राजीनामा द्या. मी कागदावर सही करून ठेवतो. तो कागद तुम्हीच राजभवनला जावून द्या. मात्र येथे समोर या, मी पद सोडायला तयार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं.
ते पुढं म्हणाले की, अविश्वास ठराव मला नकोय. मला कोणत्याही आमदाराने येऊन सांगवं की, मुख्यमंत्रीपदी नकोय. त्या आमदाराचं नावही घेणार नाही, अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.