नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही बैठक बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावली होती. सुमारे दोन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी गोपाल गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नावांचा प्रस्ताव मांडला. यानंतर शरद पवार यांनीही आम्ही नावांवर सर्वांशी चर्चा करत असल्याचे सांगितले.
या बैठकीत शिवसेना आणि कॉंग्रेससह 16 पक्षांचा सहभाग होता. संपूर्ण विरोधी पक्षाकडे एकच उमेदवार असावा, असे सर्वांचे मत होते. या बैठकीत आम आदमी पक्ष सहभागी झाला नाही. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसीही निमंत्रण न मिळाल्याने नाराज झाले.
कॉंग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), सीपीआयएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, आरजेडी, एसपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जेडी(एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि जेएमएमचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले होते. 14 जून रोजी ममता यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. दरम्यान, माकपचे सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार नसतील. ममता यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत माकपचे सर्वोच्च नेतृत्व सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहिले.
ममता यांनी विरोधी पक्षांच्या 8 मुख्यमंत्र्यांसह 22 नेत्यांना पत्र लिहून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे या बैठकीत कॉंग्रेसही सहभागी झाली होती. कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे बैठकीला उपस्थित होते. देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार असून, त्यामुळे भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधली जात आहे.
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावावर विरोधी पक्षांचे एकमत असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. शरद पवार यांच्याआधी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही राष्ट्रपतिपदाचे उमेदवार करणार असल्याच्या बातम्या येत होत्या.