मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेसाठी संभाजीराजे यांनी बोधचिन्ह अर्थात संघटनेचा लोगो बनवण्यासंदर्भांत जनतेला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आवाहन केले आहे. विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह ( लोगो ) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे, अशी आमची इच्छा आहे. अशी पोस्ट संभाजी राजे यांनी केली आहे.
कसे असावे बोधचिन्ह ?
–बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.
— बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.
— एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.
— एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.
बोधचिन्ह कसे पोहचवाल ?
आपल्या कल्पकतेने स्वराज्य संघटनेसाठी बोधचिन्ह केल्यानंतर ते पाठविण्यासाठी तात्पुरता व्हॉट्स ॲप नंबर पाठवण्यात आला आहे त्यावर आपले नाव, पत्ता व व्यवसाय याच्या माहितीसह पाठवायचे आहे. फक्त बोधचिन्ह करिता हा नंबर आहे याची नोंद घ्यावी. असेही पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
राजेंकडून होणार सन्मान
ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. अशी माहिती देखील संभाजीराजेंनी आपल्या दिली आहे. हे बोधचिन्ह पाठवण्याची अंतिम मुदत २० जून निश्चित करण्यात आली आहे.