मुंबई – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. या जागेवर भाजपने तिसरा उमेदवार दिला होता. तो मागे घ्यायला लाऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला; पण त्याला भाजपने प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडीक यांची उमेदवारी कायम ठेवल्याने या निवडणुकीत आता भाजप आणि महाविकास आघाडीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
आज सकाळी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांनी भाजपने तिसरा उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केल्यास आम्ही त्यांना विधान परिषदेची एक जास्तीची जागा देऊ, असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला होता. पण हाच उलटा प्रस्ताव महाविकास आघाडीने मान्य करावा, अशी सूचना फडणवीस यांनी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही निवडणूक अटळ बनली.
महाविकास आघाडीनेच राज्यसभेचे आपला एक उमेदवार मागे घ्यावा आम्ही विधान परिषदेला त्यांना जादा जागेसाठी मदत करू असे फडणवीस यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत सहमती होऊ शकली नाही. भाजपने आज अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत आपला तिसरा उमेवार मागे घेतला नाही. त्यामुळे आता सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात ही निवडणूक होईल. दहा जूनला यासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान या निवडणुकीतील विजयासाठी दोन्ही बाजूंनी दावे केले आहेत. आम्ही विजयाची खात्री असल्याशिवाय असल्या निवडणुका लढवतच नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे तर शिवसेनेनेही विजयाचा दावा केला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीविषयी सामोपचाराने मार्ग निघाला असता तर आम्हाला ते हवे होते.
आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. आम्ही राज्यात सत्तेवर आहोत आणि आपले सर्व उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.