नवी दिल्ली – देशाचा विकास दर कमकुवत होत असल्याचे दिसत असून भारतीय अर्थव्यवस्थेची रिकव्हरी होईल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली होती पण सध्या तसे होताना दिसत नाही असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केले आहे.
ते म्हणाले की सन 2021-22 या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत 8.7 टक्के इतकी वाढ झाल्याचे सरकारने सांगितले आहे पण त्यानंतर गेल्या तिमाहीत जीडीपीची वाढ पुन्हा मंदावलेली दिसत असून ही वाढ जेमतेम 4.1 टक्के इतकीच आहे ही चिंतेची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की गेल्या आर्थिक वर्षातील संपुर्ण वर्षातील जीडीपीची टक्केवारी पाहिली तर त्यात 20.1 टक्क्यांवरून 4.1 टक्के अशी घसरण झालेली दिसत आहे. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 20.1 टक्के इतकी होती ती घसरत घसरत शेवटच्या तिमाहीत 4.1 टक्के इतकी झाली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
यात चांगली रिकव्हरी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की 2021-22 मधील जीडीपी 2019-20 मध्ये साध्य केलेल्या पातळीपेक्षा कमी आहे म्हणजे दोन वर्षांनंतर, भारताची अर्थव्यवस्था 31-3-2020 ला होती त्याच पातळीवर आहे असेही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.