नवी दिल्ली – भ्रष्टाचार करणारा व्यक्ती गद्दार असतो, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे आहे. हे जर खरे असेल तर केजरीवाल सत्येंद्र जैन यांचा बचाव कसा काय करत आहेत, असा सवाल केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. जैन हे बोगस कंपन्यांचे मालक असल्याचे नमूद त्यांच्यावर आरोपांची सरबत्ती करताना इराणी यांनी केजरीवाल यांनाही अनेक प्रश्न आज झालेल्या पत्रकार परिषदेत विचारले.
चार बोगस कंपन्या, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने जैन यांनी 16 कोटी 39 लाखांची लूट केली. त्यांनी 2010 ते 2016 या काळात हा सगळा प्रकार केला. याचा केजरीवाल इन्कार करू शकतात का, असा प्रश्न इराणींनी त्यांना विचारला.
इराणींनी विचारलेले अन्य प्रश्न:
ते 16 कोटी 39 लाख रूपये जैन यांचेच असल्याचे प्रधान आयकर आयुक्तांनी मान्य केले आहे, ते खरे आहे का?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठानेही ते पैसे जैन यांचेच असल्याची पुष्टी केली हे खरे आहे का?
जैन चार शेल कंपन्यांचे लाभार्थी असून आपल्या पत्नीसमवेत त्यांचेच या कंपन्यांवर नियंत्रण होते, हे खरे आहे का?
जैन यांनी उत्तर दिल्लीत 200 बिघा अनधिकृत जमीन खरेदी केली हे खरे आहे का?
भ्रष्टाचार करणारे गद्दार असतील तर दिल्लीचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक त्यांना संरक्षण देत आहेत का?
गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळाल्यानंतर आपच्या सरकारने अनधिकृत वस्त्यांवर अधिकृतचा शिक्का मारला हे खरे आहे का?
आदी तब्बल दहा प्रश्न इराणी यांनी केजरीवालांना विचारले आहेत. आपण या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास केला असून हे प्रकरणच बोगस असल्याचा दावा जैन यांच्या अटकेनंतर काल केजरीवाल यांनी केला होता. त्याला या पत्रकार परिषदेमार्फत भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.