सातारा – माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात दिगंबर आगवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
याबाबत माहिती अशी, फलटण येथील दिगंबर आगवणे यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात फसवणुकीचा तक्रार अर्ज फलटण पोलीस ठाण्यात दिला होता. त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगून फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप आगवणे यांनी केला होता. त्यांनी फलटण येथील प्रथमवर्ग न्यायालयात धाव घेतली होती. आगवणे यांच्या अर्जाची दखल घेऊन न्यायालयाने खा. निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
फलटण न्यायालयाच्या आदेशाला खा. निंबाळकर यांनी सत्र न्यायालयात आव्हान देऊन तात्पुरती स्थगिती मिळवली होती. पोलिसांनी निंबाळकरांना मदत करण्यासाठीच गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप करून आगवणे यांनी फलटण पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर अनेक घडामोडी घडल्यानंतर सत्र न्यायालयाने खा. निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता; परंतु आगवणे यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर आक्षेप घेतला होता. या गुन्ह्याचा तपास दुसऱ्या सक्षम यंत्रणेकडे देण्याची मागणीही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत ना. दिलीप वळसे-पाटील यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपवण्याचा आदेश दिला. आगवणे यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली, असेही सूत्रांनी सांगितले.
डीवायएसपी, निरीक्षकावर भरवसा नाही?
आगवणे व खा. निंबाळकर यांच्यातील वादाने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यानच्या काळात फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर आगवणे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गंभीर गुन्हा नसतानाही तो सीआयडीकडे वर्ग केल्याने फलटण पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे.