नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी देशभरातील मुस्लिमांनी संघटित होऊन सद्यस्थितीला सामोरे जावे, असे म्हटले आहे. सध्या देशभरात द्वेषाची बीजे पेरली जात असून देशवासीयांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, ते आपण टाळले पाहिजे. पण सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीशी लढा दिला तर अशा परिस्थितीला तोंड देता येईल. राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
अब्दुल्ला म्हणाले की, मुस्लिमांना प्रत्येकवेळी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु असे सल्ले देणाऱ्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांच्या वडिलांनी हा देश आपला मानला आहे आणि ते येथून जाणार नाहीत. शेख अब्दुल्ला जेव्हा भारताप्रती त्यांच्या निष्ठेबद्दल बोलत होते, तेव्हा या देशात असे नेते होते की ज्यांना आपले मानले जाऊ शकत होते. लोक हिंदू-मुस्लिमांना वेगळे पाहत नव्हते, पण सध्याचे राजकारणी लोकांमध्ये फूट पाडत आहेत. विश्वासाच्या अभावामुळे लोकांमधील नातेसंबंधही कमकुवत होत आहेत, परंतु विश्वासाची ही ताकद कमी होऊ देऊ नये.
देशातील मुस्लिमांचा आवाज उठवत नसल्याबद्दल फारुख अब्दुल्ला यांनी मीडियावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये केवळ एका बाजूचा मुद्दा मांडला जात आहे. यासाठी मीडिया सेलची स्थापना करावी, असे ते म्हणाले. यातून मुस्लिमांनी आपले म्हणणे देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निवडणुकीची वेळ आली की केवळ मुस्लिम जनताच नाही, तर मुस्लिम नेतेही विकले जातात. असे नेते मुस्लिमांच्या दुरावस्थेला जबाबदार असून त्यांना काळजीपूर्वक ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले.
देशातील मुस्लिमांना संघटित करण्यासाठी समिती –
दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात देशातील सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी खासदार मोहम्मद अदीब यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती संपूर्ण देशाचा दौरा करून संपूर्ण देशातील मुस्लिमांना संघटित करून सद्यस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा देईल.