पिंपरी – चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आर्यन खान यांच्यावर जे आरोप केले गेले होते. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळले नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
चिंचवड येथील महात्मा फुले महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गृहमंत्री आले होते. या वेळी आर्यन खान प्रकरणावर भाष्य करताना ते म्हणाले, अंमलीपदार्थ बाळगल्याचे, त्याचे सेवन केल्याच्या प्रकरणात एनसीबीने न्यायालयात दाखल केलेल्या सहा हजार पानांच्या आरोपपत्रात (चार्जशीट) आर्यन खानचा समावेश नाही. चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
आर्यन खान यांच्यावर जे आरोप केले गेले होते. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे चार्जशीटमधून आर्यन खानचे नाव वगळले आहे. मला असे वाटते की केंद्राने सुद्धा याची दखल घेतलेली आहे. तसेच संबंधिताविरुद्ध कारवाईची सूचना दिलेली आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता कारवाई होईल असे वाटते का, असे विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, वानखेडे यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही ते म्हणाले.