नवी दिल्ली – तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून ते देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी शनिवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
देशाला भेडसावणाऱ्या समस्या आणि राजकीय मुद्द्यांवर केसीआर आणि अखिलेश यांच्यात चर्चा झाली. नंतर केसीआर यांनी केजरीवाल यांच्या समवेत दिल्लीतील एका सरकारी शाळेला भेट दिली. दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्या मॉडेलची तेलंगणमध्येही अंमलबजावणी करण्याची ग्वाही केसीआर यांनी दिली.
केसीआर आणि केजरीवाल यांच्यात राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. राष्ट्रीय मिशनचा भाग म्हणून केसीआर आठवडाभर विविध ठिकाणचा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यावेळी ते राष्ट्रीय राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीही त्यांच्या अजेंड्यावर आहेत.
केसीआर यांनी याआधीच राष्ट्रीय राजकारणात भूमिका निभावण्याचा मानस जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी काही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीही घेतल्या. त्यामुळे ते भाजप आणि कॉंग्रेसला दूर ठेऊन तिसरी आघाडी स्थापण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.