मुंबई – भारतीय जनता पक्षाने विविध बाबींवर देशात प्रक्षोभक वातावरण निर्माण करून संपुर्ण देशभर केरोसीन टाकून ठेवले आहे. केवळ एका ठिणगीतून त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते असे जे विधान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे त्या विधानाचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी जे काही बोलले ते खरे आहे. काही दिवसांपुर्वी आम्हीही वेगळ्या शब्दात अशीच भूमिका मांडली होती असे ते म्हणाले. राऊत म्हणाले की केद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपने लोकशाहींचा गळा घोटला आहे ही वस्तुस्थितीच आहे.
आज केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्या विरोधात अशा कारवाया सुरू आहेत हे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे देशातील लोक आज भयभीत आहेत. कोणीही सत्य बोलायला तयार नाही, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणेही आज देशात अवघड होऊन बसले आहे असे ते म्हणाले.