गांधीनगर – पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनातून युवा नेता अशी ओळख मिळवलेल्या हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेस पक्ष सोडताना हार्दिक पटेल यांनी पक्षावर आपल्याला कामच करू न दिल्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर अद्याप तरी कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश केला नसला तरी त्यांच्या मागील क्काही दिवसांतील गाठी भेटींवरून ते भाजपचा झेंडा हातात घेतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अशातच हार्दिक पटेल यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उद्योगपती अनिल अंबानी व गौतम अदानी यांच्या संपत्तीतील वाढीवरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी
एका वृत्तसंस्थेशी बोलताना हार्दिक पटेल यांनी, कोणताही उद्योगपती हा आपल्या कष्टाने मोठा होत असतो. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे असल्याने त्यांच्या राज्यातील उद्योगपतींना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हंटले. पंतप्रधान मोदींवरील राग काढण्यासाठी अदानी अंबानींना टार्गेट केलं गेलं. हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी सरकार सत्तेत असताना उद्योगपती अदानी व अंबानी यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे तर सामान्य जनतेला मात्र महागाई, बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. मोदी सरकार हे केवळ आपल्या मित्रांसाठी काम करत असल्याची मांडणी काँग्रेस व राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने करण्यात आली आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या या टीकेलाच जनतेची दिशाभूल असल्याचं म्हटलंय.
मी माझ्या राजकीय आयुष्यातील ३ वर्ष वाया घालवली
“काँग्रेस पक्षात राहून मी माझ्या राजकीय आयुष्यातील ३ वर्ष वाया घालवली. पक्षात असताना ना मला कोणते काम करू दिले ना कोणती जबाबदारी दिली. मी काँग्रेस पक्षात नसतो तर मला गुजरातच्या जनतेसाठी काहीतरी चांगलं करता आलं असत.” अशी खंत हार्दिक पटेल यांनी बोलून दाखवली.
I wasted 3 yrs of my political life in Congress. If I had been not in Congress I could have worked better for Gujarat. Neither did I ever get an opportunity to work while being in the party nor did Congress give me any work: Hardik Patel after resigning from Congress y’day pic.twitter.com/Du49B5sh6N
— ANI (@ANI) May 19, 2022