पुणे- प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या भारतीयांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पुढील आवठड्यापासून देशात राजस्थान वगळता अन्य राज्यांत उष्णतेचा त्रास कमी होणार आहे. शिवाय, त्यापुढील काळात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, “दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश व अर्ध्या मध्य प्रदेशात दि. 11 ते 13 मे काळात उष्णतेच्या झळा वाढतील. पण, 14 मेनंतर तापमानात झपाट्याने घट सुरू होईल. ही घसरण 24 मेपर्यंत कायम राहील. त्यानंतर पुढील काही दिवस तापमानात काहीशी वाढ होऊ शकते. पण, केरळात मान्सून धडकल्यानंतर लगेचच मध्य भारतात मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. यामुळे तापमानात आपसूकच घट होईल.’
उष्णतेचे प्रमाण कमीच
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, दि. 11 ते 13 मेपर्यंत महाराष्ट्रासह 5 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण, त्याची तीव्रता एप्रिलसारखी नसेल. तर, 14 मेपासून उत्तर-पश्चिम भारतातील तापमानात घट होईल. त्यापुढील आठवडा पहिल्या 2 आठवड्यांच्या तुलनेत कमी उष्ण असेल.
मोठे वातावरणीय बदल
मेच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण भारत, ईशान्य व उत्तरेतील डोंगराळ राज्यांत पावसाचा जोर वाढेल. यामुळे वायव्येतील पठारी भागातील तापमान नियंत्रणात राहील. तथापि, चौथ्या आठवड्यात थोडीशी वाढ होईल. पण, ते फार काळ चालणार नाही. त्यानंतर मान्सून दाखल होऊन तापमान नियंत्रणात येईल.
“असनी’चा प्रभाव
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असून, पुढील टप्प्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीस पूरक स्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान, पुढील आठवड्याच्या अंतिम टप्प्यात मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो. तर, मे अखेरीस तो केरळमध्ये येऊ शकेल, अशी स्थिती आहे. पण, याबाबत हवामान विभागाने अधिकृत माहिती तूर्त दिलेली नाही.