लखनौ- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी 5 जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा अपमान सहन केला जाणार नाही, 5 जूनला अयोध्येला जायचे असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
आपल्या अभियानाला उत्तर प्रदेशमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसे च राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून मोठे समर्थन मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून पोस्टर देखील शेअर केले आहे.
दरम्यान, कोण काय बोलतेय याला महत्व नाही. संबंधित व्यक्तीला त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा अगोदरच फोन गेला असेल असा दावा मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी काल केला होता. त्यानंतर आज या खासदारांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. आता मनसे काय उत्तर देते किंवा भाजपचे राज्यातील नेते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.