पुणे –शहरात उन्हाचा चटका वाढल्याने तसेच महापालिकेची पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळी नसल्याने शहरातील बेघर नागरिकांना मुठानदी काठावर अमृतेश्वर मंदिराजवळ असलेल्या पेशवेकालीन नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यातून उन्हळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय होत होती. मात्र, या झऱ्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा झरा घाणीत मराणासन्न अवस्थेत आहे. करोना संकटापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून या झऱ्यातून वर्तक उद्यानासाठी पाणी वापरण्यात येत होते. मात्र, करोनानंतर याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. 2013 मध्येही अशाप्रकारे तीव्र पाणीटंचाई ओढावल्याने महापालिकेने शहरात असलेल्या पेशवेकालीन नैसर्गिक पाण्याच्या स्रोत्रांचे सर्वेक्षण करून हे पाणी शहरात वापरण्यास देण्याचे नियोजनही केले होते. त्यामुळे सर्व स्रोतांची माहिती तसेच स्वच्छता हाती घेतली होती. मात्र, वेळवर पाऊस आल्याने स्रोतांचा वापर करावा लागला नाही. अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या या जलस्रोतातील पाणी चांगले असल्याने महापालिकेने हे पाणी साठण्यासाठी हौद बांधला असून आसपास आवश्यक जिनेही उभारले आहेत. हे पाणी स्वच्छ असल्याने अनेक बेघर कुटुंबे हे पाणी पिण्यासाठी तसेच इतर कारणास्तव वापरत होते. तसेच उन्हाळ्यात त्याचा नागरिकांना फायदा व्हायचा मात्र आता हा जलस्रोत कचऱ्यात बुडाल्याने बेघरांना पाण्यासाठी असलेला एकमेव आसराही संपलेला असून पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे.
मेट्रोसाठीही वापरता आले असते पाणी
या झऱ्याच्या बाजूला 50 मीटर अंतरावरच महामेट्रोचे काम सुरू आहे. या झऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा महामेट्रोलाही वापर करता आला असता, पालिकेने या पूर्वीच महामेट्रोने शहरात मैलापाणी केंद्रात स्वच्छ केलेले पाणी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, महामेट्रोने त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता. मात्र, मेट्रोला हे पाणी निश्चित बांधकामासाठी वापरता आले असते.