पुणे -‘राज ठाकरे यांनी केलेले एकही आंदोलन यशस्वी झालेले नाही. टोलविरोधात आंदोलन केले. पण एक दिवस फक्त टोल नाक्यावर जमले. पुढे काय झाले? परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले. राज ठाकरे यांची सगळी आंदोलने राज्याला आणि समाजाला नुकसानकारक ठरली,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. “टोलमुळेच अनेक रस्त्यांची कामे झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मग टोल बंद केले तर कामे कशी होणार? छोट्या रस्त्यांवर टोल नको. मात्र, समृद्धी महामार्गासाठी 45 हजार कोटींचा खर्च करण्यात आला. टोलमधून ही कामे पूर्ण होतात. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टोलच्या रकमेतूनच रस्त्यांच्या मेटेन्सची कामे पूर्ण होतात,’ असे पवार यांनी सांगितले.
“परप्रांतियांना चले जाव म्हटले. त्यामुळे बांधकामे कामे बंद पडली. व्यावसायिक हतबल झाले. टॅक्सीवाल्यांना मारले ते आंदोलन फेल झाले. फुकटची प्रसिद्धी आणि त्याचा हव्यास काही राजकारण्यांना हवा असतो. कारण लाखो, करोडो रुपये खर्च करून तो मिळत नाही,’ अशी टीका पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
धार्मिक स्थळांबाबत आदर असावा
भोंग्याच्या विषयावर पवार म्हणाले, “लाऊडस्पीकरबाबत नियमावर बोट ठेवायचे म्हटले तर सगळ्यांचीच पंचाईत होईल. डेसिबलची मर्यादा मोजायची झाली तर जे सूर्यास्तानंतर सभा घेतात, त्यांच्या सभेवर गंडांतर येईल आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होईल. धार्मिक स्थळांबाबत आदर असला पाहिजे. ज्यांनी परवानगी घेतली ते लाऊडस्पीकर लाऊ शकतात. अशा प्रकारांमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पण लक्षात घेतले पाहिजे.’